अजितदादांमुळे अनेकांच्या मंत्रिपदाच्या आशेवर फिरले पाणी
मुंबई (प्रतिनिधी) – मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या आशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाच्या सरकारमध्ये काही नाराज आमदारांची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याने नाराज आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. यामुळे मंत्रीपदासाठी आस लावून बसलेले आमदार प्रचंड नाराज आहेत. तसे अनेकांनी मुख्यमंत्र्यांना बोलूनही दाखवले. परंतू चिंता करु नका आणि मीडियाशी बोलू देखिल नका, अशी तंबी मिळाली असल्याने शिंदे गटातील नाराज आमदारांची अवस्था सहनही होत नाही व सांगताही येईना अशी झाली आहे.
अजितदादांनी उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे आलो. आम्हाला वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी आमच्याबरोबर येईल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला ‘ते’ जॉईंट होतील असे वाटले नव्हते. त्यामुळे आमचा हिस्सा कमी झाला. ते नसते तर आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली असती. मात्र, आता काही लोकांना थांबावे लागेल. नाराज होऊन आता काय करणार जे आहे त्याला सामोरे गेले पाहिजे, अशी नाराजी भरत गोगावले यांनी व्यक्त केली होती.
आम्हाला भाकरी खायची होती. पण आता काही जणांना अर्धी भाकर मिळणार. ज्याला अर्धी मिळणार होती त्याला पाव भाकरी मिळणार. आता जे समोर येईल ते पाहू त्याला सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे निर्णय घेतले तो देशहितासाठी राज्यहितासाठी घेतला आहे. तो स्वीकारणे क्रमप्राप्त आहे असेही ते म्हणाले होते. आता अनेक आमदारांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक झाल्यानंतर आमदार अस्वस्थ असले तरी शिंदे गटाचे मंत्री मात्र प्रसारमाध्यमांना सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत आहेत.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा अजिबात प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. आम्ही मोठ्या ताकदीने पुढील निवडणुकांसाठी तयारी करणार आहोत, तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. बोटावर मोजण्याइतके आमदार राहिलेल्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरवू नये, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला. तर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, काही लोक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून हटवले जाणार अशी दिवास्वप्न पाहत आहेत. परंतू त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी आम्हाला निवडणुकीच्या तयारीसाठी लागा, लोकांच्या कामावर विशेष लक्ष द्या, अशा सूचना दिल्या आहेत.