लिपिकासह ३५ जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (आरटीओ) ई-चलन घोटाळा उघडकीस आला आहे. कार्यालयातील लिपिकासह, एजंट व इतर ३५ जणांवर सुमारे अडीच लाखांचा अपहार झाल्याने रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात धक्कादायक म्हणजे आरटीओ कार्यालयात लिपिक, एजंट व मालक यांनी बनावट दस्ताऐवज बनविले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन वाहनाच्या दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लिपीक नागेश गंगाधर पाटील, एजंट सुलतान बेग मिर्झा, गणेश कौतिक ढेंगे यांच्यासह वाहन मालक अशा एकूण ३५ जणांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहार व कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. २ लाख ३८ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश रामराव पवार (५७, रा.नेहरु नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील वर्षी सप्टेबर २०१९ मध्ये नागेश पाटील हे खटला विभागात लिपीक म्हणून कार्यरत असताना वायु वेग पथकाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत महाजन यांनी रस्त्यावरील वाहन तपासणीदरम्यान मनसूर खान मेहबूब खान (रा.भुसावळ) याचे वाहन (क्र.एम.एच.१९ बी.एम.५९९५) अडविले होते. कागदपत्र तपासणीत विमा, योग्यता प्रमाणपत्र व वाहन कर नसल्याने हे वाहन एस.टी.वर्कशॉपमध्ये जमा करण्यात आले होते. या वाहनास कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील यांनी वाहनमालकाशी संगनमत करुन ‘कॅश ऑन रोड’ या पध्दतीचा अधिकार नसताना वापर केला. तसेच १९ सप्टेबर २०१९ रोजी ३१०० रुपये ई-चलन प्रणालीत भरल्याचे खोटे दाखविले. यासाठी त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी म्हणून खोटी सही करुन २७ सप्टेबर २०१९ रोजी परस्पर वाहन सोडण्याचे आदेश केले. कार्यालयीन कॅशबुक तपासणी झाली असता त्यात या वाहनाचे चलन व वाहन क्रमांकही आढळून आला नाही. नागेश पाटील यांनी स्वत:च्या ई-चलन लॉगइनमध्ये खोटी डेटा एन्ट्री करुन वरिष्ठ अधिकाऱ्याची मान्यता न घेता शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.
हे प्रकरण उघड झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, प्रकाश पाटील व राकेश पवार यांची समिती नेमली. त्यात विविध ठिकाणी कारवाईसाठी अडवून ठेवलेल्या ४१ वाहनांचा दंड एजंट व मालकांशी संगनमत करुन तडजोड रकमा न घेता खोट्या सह्या व शिक्के मारुन परस्पर सोडल्याचे उघड झाले. ही रक्क्कम २ लाख ३८ हजार १०० इतकी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी रात्री पावणे बारा वाजता ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील, वाहन मालक मनसूर खान मेहबूब खान, समाधान भागवत पाटील, भरत हिंमत चौधरी, एकनाथ पांडे, फकिर शाहरुख शहा खलील शहा, प्रो.प्रभंजन ऑटो, जगदीश काशिनाथ माळी, मजित खान बशिद खान, शिकलगरे, मो. शरिफ मो.याकूब बागवान, सूर्यकांत गोबा कोळी, अशोक नामदेव कोळी, प्रवीण व्यंकटेश हिलगोळे, कैलास नारायण पाटील, सचिन सोमनाथ सरदार, शिवराम जयराम माळी, विशाल नामदेव मुसळे, वासुदेव ज्ञानेश्वर बोबडे, रमेश दशरथ भंगाळे, मोतीलाल सदाशिव दिक्षीत, विनोद प्रल्हाद बडगुजर, सुनील सुखदेव गढे, बापू आनंदा पाटील, विजयसिंग महाजन,याच्या सह आदी संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.