स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – रिक्षामध्ये प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वसीम कय्यूम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी) आणि तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. दोघांना पुढील चौकशीसाठी बऱ्हाणपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसवून त्यांच्या खिशातील रोकड व मौल्यवान वस्तू कापून नेण्याच्या घटना घडत होत्या. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम खाटीक व तौसीफ खान हे या चोरींमध्ये सामील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
या माहितीवरून उपनिरीक्षक शरद बागुल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली.
या कारवाईनंतर बऱ्हाणपूर पोलिसांनी दोघांना आपल्या ताब्यात घेत तपासाची दिशा पुढे नेली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.









