जळगाव ते भुसावळ रेल्वे लाईनवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कडगाव येथील ४७ वर्षीय महिलेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरलाबाई ईश्वर पाटील (वय ४७ रा. कडगाव ता.जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. सरलाबाई पाटील या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते भुसावळ रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४२४ च्या १४ आणि १६ च्या दरम्यान सरलाबाई पाटील या रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांना धावत्या रेल्वेचा धक्का लागला.
या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.