जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना, रावेरला शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : रावेरहून जळगावला आलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीचा परत रावेरला जात असताना, जळगाव रेल्वे स्थानकात आल्यावर रेल्वेत चढताना तोल जावून रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल राजाराम जाधव (वय ३६) असे मयत इसमाचे नाव आहे. रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात माहेरी आल्या होत्या. (केसीएन)त्यात दोन दिवसांपुर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते.
त्यावेळी रात्री ९ वाजता कामायनी एक्सप्रेसमध्ये चढत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.