जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील आव्हाणे येथील सुनील पुंडलिक चौधरी व त्याची पत्नी अंकिता चौधरी हे त्यांच्या नातेवाईकांसह जळगाव रेल्वे स्थानकावरुन पालघर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांची १५ ग्रॅम मंगळसूत्र, १९ ग्रॅमची एक सोन्याची चैन असे साडेतीन लाखांचे दागिणे व कपडे तसेच इतर साहित्य असलेल्या दोन बॅग जळगाव रेल्वेस्थानकावर राहिल्या. रेल्वे गाडीत काही अंतर प्रवास केल्यानंतर सुनील चौधरी यांना बॅग रेल्वेस्थानकावर विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांचे जळगाव शहरातील साडू ज्ञानेश्वर पाटील यांना माहिती दिली. ज्ञानेश्वर पाटील यांनी जळगाव रेल्वे स्टेशन गाठले व रेल्वे पोलीसांना घटना सांगितली.
त्यानुसार रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामराव इंगळे व पोलीस शिपाई किशोर पाटील यांनी तत्काळ रेल्वे स्थानक परिसरात बॅगचा शोध घेत बॅग सुखरुप परत मिळवून दिल्या. पोलिसात जबाब नोंदवून घेत दोन्ही बॅग ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.