रावेर तालुक्यातील निंभोरा गावाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सन्मित्र कॉलनी येथील रहिवासी तथा खिर्डी ता. रावेर येथील तरुणाने नैराश्याखाली आल्याने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि.२३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पराग विनायक कोल्हे (वय ४२, रा. सन्मित्र कॉलनी, जळगाव, मूळ खिर्डी ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. खिडकी ग्रील संबंधित व्यवसाय करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)रावेर तालुक्यातील खिर्डी येथे त्यांची शेती आहे. गावाकडे काही कामानिमित्त पराग कोल्हे हे शनिवारी गेले होते. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ते निंभोरा येथे रेल्वे रुळाकडे खंबा क्रमांक ४७१/११ ते १३ दरम्यान गेले होते. काही वेळाने आलेल्या पठाणकोट एक्स्प्रेसखाली त्यांनी झोकून देत आत्महत्या केली.
पोलिसांनी सुरुवातीला अनोळखी असलेल्या या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले. मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून ओळख पटविली.(केसीएन)मृतदेह खिर्डीचा पराग कोल्हे याचा असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे खिर्डी गावासह जळगावात शोककळा पसरली. घटनेची निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.