जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवाराचा शोध सुरूच आहे. खडसेंच्या घरवापसीनंतर आता पक्ष केवळ उद्योजग व समाजसेवक श्रीराम पाटील व ॲड. रविंद्रभैया पाटील याच दोन नावांवर विचार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वांगाने सक्षम असलेल्या अशा उमेदवारावर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाला भाजप नेत्यांना गळाला लावून उमेदवारी द्यावी लागली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरद पवार गटाने देखील अमोल जावळे व इतर नेत्यांशी चर्चा केली. मात्र अमोल जावळे यांच्यासह काही भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आता पक्षातीलच नेत्यांसह काही नवीन चेहऱ्यांवर विचार सुरु आहे. जळगाव मतदारसंघात युवा करण पवार सारखा कोरा चेहरा जाहीर झाला तसाच, रावेर मतदारसंघात नवीन कोरा चेहरा म्हणून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांच्या नावावर चर्चा सुरु आहे.
श्रीराम पाटील यांना रावेर भागात शेतकरी, व्यापारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औदयोगिक अशा विविध क्षेत्रातील नागरिक ओळखतात. उच्च व सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व उद्योजक श्रीराम पाटील आहे. अभ्यासू असलेले श्रीराम पाटील हे खासदार म्हणून दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगल्या प्रकारे संसदेत विषयांची व लोकप्रश्नांची मांडणी करू शकतात. त्यामुळे शरद पवार यांनी स्वतः श्रीराम पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता श्रीराम पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड .रविंद्रभैया पाटील याच दोन नावांवर चर्चा करीत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातारा, माढा व रावेर या राहिलेल्या जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.