इतर खड्ड्यांची समस्या मात्र ‘जैसे थे’
जळगाव (प्रतिनिधी) – आकाशवाणी चौकात निर्माण झालेल्या खड्डयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच, मागील महिन्यात एका प्रौढाचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी २५ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे खड्डयाची डागडुजी करणेत आली असून वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दुर करणेत आला आहे. मात्र महामार्गावरील खड्ड्यांची समस्या अजूनही गंभीरच आहे.
आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते पाच खड्डे पडलेेले आहेत. यापुढे रस्त्यावरून जाताना मार्गात अनेक ठिकाणी लहान-मोेठे खड्डे पडलेले आहेत. अग्रवाल चौकात रस्त्यात आणि रस्त्याच्या बाजूला लांबीला तीन ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून भली मोठी डाब साचत आहेत. वाहनधारकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. या कोंडीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळा-महाविद्यालयाचा हा परिसर असल्याने, विद्यार्थांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
आकाशवाणी चौकापासून ते दादावाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या खाली पाच ते सहा इंचापर्यंत खाली गेलेल्या आहेत. दुचाकी वाहन घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरून दोन्ही बाजूला साईडपट्ट्याची प्रचंड दुरवस्था आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळेच रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने महामार्गावरचे खड्डे तरी बुजविणे गरजेचे आहे. मात्र, खड्ड्यांकडे महामार्ग प्रशासन गांभीर्याने पाहायला तयार नाही.