नवी दिल्ली(वृत्तसंस्था) ;- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी एन. व्ही. रमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमण हे भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. करोनामुळे शपथविधी सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांचा कार्यकाळ संपल्याने उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सरन्यायाधीस शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. रमण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत, ते सरन्यायाधीश या पदावर गेले आहेत. २७ जून २००० साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्चन्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचे काम पाहिले आहे.
६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. पोन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. रमण यांचे बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेले असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहे.







