वर्चस्वाच्या राजकारणाचा तवा तापवताना
भगवान सोनार
जळगाव जिल्ह्यातील राजकारण तसे जवळपास दशकभरापासून राज्यात लक्षवेधी ठरले आहे. त्यामुळेच मूलभूत सुधारणांच्या नावाने बोंब असली आणि पुढेही कुणाकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसला तरी वर्चस्वाचे राजकारण कसे करावे आणि या निव्वळ वर्चस्वाचा हव्यास महत्वाचा ठरणाऱ्या राजकारणात लोकप्रश्नांचा कसा ‘खेळ’ करावा, याचा हा ‘जळगाव पॅटर्न ‘ एकमेव ठरावा. सध्या या चर्चेला निमित्त बोदवड आणि मुक्ताईनगरातील राजकीय वर्चस्वाचा मुद्दा ठरत असला तरी नेत्यांच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा चुराडा होतो आणि त्याची फलनिष्पत्ती पाहून सामान्य माणूस फक्त ‘ राजकारणाचा विजय असो !! ‘ एवढे म्हंणण्यापुरताच राजकारणात शिल्लक दिसतो.
नुकतेच बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान झाले. त्या मतदानाच्या दिवसापासून हा राजकीय संघर्ष भडकलेला आहे. त्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर बोट ठेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन , त्याला शिवसेना पदाधिकारी आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनीं दिलेले उत्तर , अँड रोहिणी खडसे यांनी केलेली विधाने , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी यांना आरोपी ठरवून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले विनयभंग आणि धमक्यांचे गुन्हे आणि काल झालेला रोहिणी खडसे यांच्या वाहनावरील हल्ला ; असा हा घटनाक्रम आहे. हा सगळा घटनाक्रम हेच सांगतोय की हा दोन पक्षांमधला संघर्ष नाही , तर हा राजकीय संघर्ष दोन नेत्यांमधला आहे.
स्थानिक राजकारणात एकनाथराव खडसे यांच्या राजकीय नेतृत्वाला आव्हान देणारा माणूस उभा रहावा म्हणून आमदार चंद्रकांत पाटलांना एकनाथराव खडसे यांचे ‘ उघड शत्रू ‘ आणि ‘ हितशत्रू ‘ अशा दोघांनाही बळ आतापर्यंत दिले आहे ; हेही लपून राहिलेले नाही. या दोघांची राजकीय अनुभवाच्या दृष्टीने तुलना या वादात या घडीला कुणी करणार नाही , पण या दोघांना ‘ खेळवणारे ‘ किंवा हे दोघे असेच ‘ खेळत ‘ राहिले पाहिजेत असे ज्यांना वाटते ते नक्कीच सध्या खुशीत असतील , हे मात्र नक्की.
सध्याच्या राजकीय कुरघोडीच्या या डावात आपापल्या नेत्यांच्या बाजूने एकमेकांशी उघड राजकीय शत्रुत्व घेण्याची तयारी ठेवणारे कार्यकर्ते कालचा हल्ला आणि आधीच्या विनयभंग व धमक्यांच्या गुन्ह्यांमध्ये भरडले जाणारच आहेत . या भरडले जाण्यातून या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना राजकारणातून नेमके काय हाती लागेल याचे उत्तर तर आता काळाच्या हवाली सोडावे लागणार आहे . स्वाभाविकपणे एकनाथराव खडसे यांच्याकडून दुखावले गेलेले लोक या घटनांकडे ‘ उट्टे ‘ काढण्याची संधी म्हणून पाहत असतील तरी राजकारणातला जो कुणालाही कामापुरते वापरून घेण्याचा तद्दन स्वार्थीपणा असतो तो या संघर्षात थेट भिडण्याची तयारी दाखवणाऱ्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या कितपत पथ्यावर पडेल याची हमी कोणताच पक्ष किंवा नेता देऊ शकणार नाही. ‘सत्तालक्षी ‘ राजकारणातले असे तणाव भडकतात आणि कालांतराने विझुनही जातात , हे पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र बळी पडतो तो राजकारणाला विधायक वळण कसे आणि कधी मिळेल ? , या भावनेचा म्हणूनच राजकारणाचा विजय असो !!