चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील सानेगुरुजी वसाहतीत बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेऊन तसेच विवाहासाठी मदत केली म्हणून एका तरुणास पाच ते सहा जणांनी चाकू हल्ला करीत जबर जखमी केले. प्रसंगी काही क्षण पळापळ झाल्याने तणाव होता. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून कुठल्याच अफवेवर विश्वास ठेऊ नये अशी माहिती चोपडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
शहरात सानेगुरुजी वसाहतीत एक तरुण राहतो. त्याने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाला त्याचा चुलतभाऊ आकाश संतोष भोई (वय २५, रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) याने मदत केली होती. याचा राग विवाह केलेल्या मुलीच्या भावाला होता. मंगळवारी २० जून रोजी दुपारी आकाश सानेगुरुजी वसाहतीत आल्याची माहिती मिळाल्यावरून संशयित ५ ते ६ जणांनी आकाशला घेरून जाब विचारला. त्यातील एकाने आकाशच्या मांडीवर चाकूने वार केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. प्रसंगी पळापळ झाली. त्यामुळे मुख्य बाजार पेठेतील दुकाने बंद झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. के. के.पाटील, सपोनि अजित साबळे, पोउनि संतोष चव्हाण आणि कर्मचारी घटनास्थळी पोचले. नागरिकांना आवाहन करत आपापली दुकाने उघडण्याची सूचना केली. जखमी आकाशला उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. जळगावात संध्याकाळी रुग्णालयात त्याला आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु झाले आहे.
दरम्यान जखमी आकाश भोई हा जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी ५ ते ६ जणांची ओळख पटवली असून ३ जण ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे. चोपडा शहरात संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.