जळगाव शहरातील वाल्मिक नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – घरी कोणीच नसतांना प्रौढाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विलास रुपचंद इंगळे (वय ५५, रा. वाल्मिक नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. विलास इंगळे हे सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी या स्वयंपाकाच्या कामाला गेल्या होत्या, तर मुलगा रिक्षामध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी गेला होता. त्यामुळे इंगळे हे घरी एकटेच होते.
दुपारी ५ वाजेच्या सुमारास विलास इंगळे यांनी घराचा दरवाजा आतुन बंद करून दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ इंगळे यांच्या मुलाला माहिती दिली. इंगळे यांचा मुलाने तात्काळ घराकडे धाव घेतली, घराचा दरवाजा उघडला असता, त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. वडीलांचा मृतदेह बघताच त्याने एकच आक्रोश केला.
त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. घटने प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.