जळगांव मनपा उधळपट्टी करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील ४९ रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मध्येच थांबवून अर्धवट स्थितीत काँक्रिटीकरण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. हे नियोजन म्हणजे जनतेच्या पैशांची संगनमताने उधळपट्टी करीत असल्याचा आरोप शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी १६ रोजी पत्रकार परिषदेत केला.
महानगरपालिकेच्या विविध मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला जवान फाउंडेशनचे ईश्वर मोरे, अनिल नाटेकर, दीपककुमार गुप्ता, शिवराम पाटील, सुरेश पांडे, दिगंबर बडगुजर, ए. एस. जाधव, अमोल कोल्हे, दिनेश भोळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी ईश्वर मोरे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना शासन जीआर नुसार वातानुकुलीत यंत्र बसविण्याचा अधिकार नसताना अनेक विभागात तसेच अधिकाऱ्यांच्या घरामध्ये वातानुकूलित यंत्र लावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच मनपाचे उत्पन्न वाढीसाठी बांधकाम झालेले ३९ पैकी २८ व्यापारी संकुल गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे मनपाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच कायम होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने ५८ नगरसेवकांची ६० कोटी ३२ लाख घरकुल घोटाळा प्रकरणी लेखापरीक्षण आक्षेपित रक्कम घेणे असताना मनपा प्रशासन वसुली करण्यात अपयशी ठरली आहे.
प्रशासनाने सदर रक्कम त्वरित वसूल करावी, जेणेकरून जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी काढता येतील असेही त्यांचे म्हणणे आहे.