घर जळाले पण उमेद कायम, जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कोल्हे वाड्यात राहणाऱ्या शितल मराठे यांच्या घराला आग लागून घरातील अन्नधान्य, कपडे,वस्तू, पगाराची रक्कम जळून खाक झाला होता. यामुळे हलाखीची परिस्थितीत जगणाऱ्या महिलेवर आणखी मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शुक्रवारी २६ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे पदाधिकाऱ्यांनी कोल्हेवाड्यात जाऊन त्यांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७ हजार ५०० रुपयांची मदत दिली. यामुळे प्रजासत्ताक दिनी मानवतेचे अनोखे दर्शन दिसून आले.
शितल मराठे यांना अद्याप शासकीय तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. सामाजिक संघटना मात्र त्यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी शीतल मराठे यांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली. तसेच, शीतल मराठे यांना सर्वतोपरी सहकार्य समाजातून मिळावे, असे आवाहन केले आहे. अध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्ष सैयद चांद यांच्यासह मन्यारवाड्यातील कार्यकर्ते अब्दुल रऊफ टेलर, राजू खरादी, अख्तर शेख, वसीम शेख, मुजाहिद खान, रफिक शेख, ताहेर शेख, जुल्कर नैन आदींनी शीतल मराठे यांच्या घरी जाऊन त्यांची आई लक्ष्मीबाई व मुलगा हेमंत यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. देशाच्या ७५ व्या गणतंत्र दिनाचे औचित्य साधून मराठे परिवाराला ७ हजार ५०० चे सहकार्य देण्यात आले.