युवा स्वाभिमानी पक्षातर्फे उद्यापासून तीव्र आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा याकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आज दि.२६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. मागण्या मान्य न झाल्यास दि.२८ जानेवारीपासून पाणी त्याग करून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचेत्यांनी सांगितले.
कामगार कायद्याअंतर्गत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात व पगार वाढ करण्यात यावी, ८ तासापेक्षा जास्त कर्तव्य केल्यास त्यांना ओवर टाईम देण्यात यावा, इतर शासकीय-निमशासकीय विभागाप्रमाणें त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनात २५ % वाढ करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातवा वेतननुसार ९९० रुपये दर प्रमाणे मानधन वेतन वाढवून देण्यात यावे तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा करण्यात यावा. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यमध्ये देखील ३ वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग,वन विभाग किंवा इतर शासकीय प्रशासकीय विभागात ५० % आरक्षणसह भरती प्रक्रियेत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक करण्यात यावी आदी मागणी आहेत.
मागण्याकरिता जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करून देखील अद्यापपावेतो त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. दि. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करीत असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच दि.२८ जानेवारीपासून पाणी त्याग आंदोलन सुरु करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.