सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात ठीकठिकाणी गावठी हातभट्टींवर धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी शनिवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. भुकन यांच्या पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी एकूण ८५ ठिकाणी कारवाई केली. यात एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे कच्चे रसायन आणि हातभट्टीची तयार केलेली दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी पोलीस दलाचे ४६ पोलीस अधिकारी, २२२ पोलीस कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान गावठी हातभट्टीवाल्यांवर गुन्ह्यांचे रेकॉर्डवरून आतापर्यंत पोलीस दलातर्फे २ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ अशा तीन जणांवर एमपीडीएच्या कारवाई अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.