मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : बैलांना धुण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावातील तलावात दोन मित्र गेले होते. मात्र ते दोघेही बुडायला लागल्यावर त्यांना विजय पाटील या ग्रामस्थाने वाचविले. यामुळे विजय पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुकळी (ता. मुक्ताईनगर) येथील नितीन काशिनाथ आमोदकर हा बैलपोळ्यानिमित्त तलावात बैलासहित उतरला होता. बैल धुताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून त्याला वाचवण्यासाठी गावातील दुसरा तरुण प्रदीप खुशाल कोळी याने पाण्यात उडी घेतली. मात्र त्यालाहि ते न जमल्याने तो सुद्धा गटांगळ्या खाऊ लागला. त्याच ठिकाणी हजर असलेल्या गावातील विजय देविदास पाटील यांच्या वेळीच लक्षात आले. त्यांनी कशाचाही विलंब न करता तलावाच्या पाण्यात उडी घेतली व दोघांना सुखरूप बाहेर काढले.
त्यांचा जीव वाचल्याने सुकळी गावावर येणारे मोठे संकट टळले. त्यामुळे दोघांना जीवदान मिळाले. त्यामुळे काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती ही म्हण खरी ठरली. यावरून विजय पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल पाण्यात बुडणाऱ्या नितीन आमोदकर व प्रदीप कोळी यांच्या कुटुंबियांनी विजय देविदास पाटील यांचे आभार मानले आहे. मुलांना जीवदान मिळाल्याचे समाधान मिळत आहे.