पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री-शिवधाम फाट्यावर आंदोलन : दोन तास वाहतूक ठप्प
पारोळा (प्रतिनिधी) : पीक विमा योजनेचे मागील वर्षातील लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांनी रत्नापिंप्री-शिवधाम फाट्यावर शुक्रवारी दिनांक २६ जुलै रोजी सकाळी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तहसीलदार उल्हास देवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भातील घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान रुग्णवाहिका जात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला. वाहनांच्या गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला.
रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे, यासाठी तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय ढमाळे, पीक विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी यांनी मध्यस्थी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मते व्यक्त करताना सांगितले की, मागील वर्षी खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी संघटनेने लगेच तत्परता दाखवून पीक विमा कंपनीचे संपर्क साधला आणि पंचनामा करायला लावला. १५ जून पर्यंत शेतकरी विमा हप्ता भरण्याची मुदत आणि एक वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ७५ टक्के विमा नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रास्ता रोको आंदोलन आहे.
तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय योजनेचे दोन हजार रुपये मिळत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. शेतकरी सन्मान योजना हा सन्मान आहे की अपमान, असा संतापही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, विविध प्रश्नांबाबत लेखी स्वरूपातील माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे रास्ता रोको आंदोलन अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, वाल्मीक कापडणे, अंकुश भागवत, गुलाब पाटील, गोकूळ पाटील, पंढरीनाथ पाटील, नरेंद्र धनगर, जगदीश मनोरे, अरविंद मराठे, बळीराम मनोरे, प्रकाश पाटील, सोमनाथ मराठे, आत्माराम पाटील, अधिकार पाटील, संजय पाटील, अनिल पाटील यासह रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, सडावण, भोकरबारी, कंकराज, भिलाली, नेरपाट आदी परिसरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी पारोळा पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, प्रवीण पाटील, आशिष गायकवाड, हिरालाल पाटील, महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.