खड्ड्यांमुळे अनेक भागात
वाहनधारकांचा त्रास
जळगाव (प्रतिनिधी) – गुरुवारी आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज न आल्याने वाहनधारकांची कसरत झाली. काही रस्त्यांची अधिक दैना झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.
जळगाव शहरात नुकतेच पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन दिवसांपासून अधून-मधून सततचा पाऊस सुरू आहे. यामुळे विविध कारणास्तव खोदण्यात आलेले खड्डे अधिक खोल झाले आहेत. पावसामुळे बहुतांश ठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येत नाही. यामुळे वाहने या पाणी साचलेल्या खड्ड्यात अडकून किरकोळ अपघात होत आहेत.
मान्सूनपूर्व कामांतर्गत महापालिका प्रशासनाने विविध रस्त्यांवरील हे खड्डे बुजवणे गरजेचे होते. मात्र, नालेसफाईप्रमाणेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसूनब्येते. खड्डे बुजवण्याची कामेही अर्धवटच करण्यात आली आहेत. भर पावसात खड्डेमय रस्त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
शहरात विविध मोबाइल कंपन्यांच्या केबल्स तसेच गॅस पाइपलाइनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे सपाटीकरण करणे आवश्यक असताना याकडेही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे खोदाई केलेले खड्डे पावसाच्या पाण्यामुळे अधिक खोल झाले आहेत.
शहरातील सखल भागात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नविपेठेत रस्त्यावरील पावसाचे पाणी इतके थांबून राहते की छोटा तलावच तयार होतो. वाहन चालवताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. असेच चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
अशातच आता रस्त्यावर पडलेले खड्डे लोकांना संकटात टाकत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चित्रा चौक, शनीपेठ आदी रस्त्यांवर खड्ड्यांचे विघ्न असल्याचे दिसून येते. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. दुचाकी वाहने स्लिप होण्याचे प्रकार घडत आहेत.