जळगाव तालुक्यातील असोदा गावातील रस्त्यांच्या कामांना सुरू करण्याचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचीती आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा रस्त्याचे काम काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्यामुळे नागरिकांनी विनंती केली की, हा रस्ता तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा शेळगाव-यावल रोड या रस्त्याचे पुढील काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू जोरदार पावसामुळे रस्ता अधिकचा खराब झाला. पाच ते सहा गावांना जोडणारा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांनी नवीन रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल, परंतू आता नागरिकांना दिलासा म्हणून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली.
त्यानुसार रस्त्याचे काम आजच सुरु झाले असून उद्या सायंकाळपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाच ते सहा गावांना ये-जा करण्याऱ्या नागरिकांना यानिमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तुषार महाजन, किशोर चौधरी, अजय महाजन, गिरीश भोळे, बाळूमामा कुंभार, ललित बाविस्कर, जीवन सोनवणे, सुनील पाटील, अनिल कोळी यांच्यासह गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.









