जामनेर (प्रतिनिधी) – पहूर येथील रहिवाशी असलेल्या ४२ वर्षीय सराफी
व्यावसायिकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांचा घात
झाला कि अपघात हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी पोलिसांनी तीन संशयितांना
ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पहूर कसबे तालुका जामनेर येथील
पूनमचंद गुलाबचंद वर्मा (वय ४२) यांचे लोहारा तालुका पाचोरा येथे मेघराज
ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे आपले
दुकान बंद सायंकाळी सात वाजता लोहारा येथून पहुरकडे आपल्या घरी निघायचे.
परंतू १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गोगडीच्या पुलाजवळ
रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मयत
वर्मा यांचा कुठल्या तरी तीक्ष्ण शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा संशय
आहे. वर्मा यांच्याजवळील बॅग व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यांची हत्या
लुटीसाठी तर करण्यात आली नाही याबाबत तपस सुरु आहे. पोलिसांनी तीन
संशयित ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस
निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे.
मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी ,एक मुलगा, एक
मुलगी, व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे
पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वर्मा यांचा मृतदेह पहुर ग्रामीण
रुग्णालयात वैद्यकीय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पहुर
पोलीस ठाण्यात प्रकाश शांतीलाल वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात
इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस
निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहे.