भुसावळ विभागात सर्वाधिक ३१३ मुलांची सुटका
जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. आरपीएफ मध्य रेल्वेने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने १०६४ मुलांची मध्य रेल्वेच्या स्टेशनवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.
जी मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येतात त्यांना प्रशिक्षित आरपीएफ कर्मचाऱ्यांनी शोधले आहेत. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३१२ मुलांची सुटका केली. भुसावळ विभागात सर्वाधिक ३१३ मुलांची सुटका केली. पुणे विभागाने २१० मुलांची सुटका केली. नागपूर विभागाने १५४ मुलांची सुटका केली. सोलापूर विभागाने ७५ मुलांची सुटका केली.