कानळदा रस्त्यावर झाला होता अपघात, तालुका पोलिसांना तपासात यश
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा रस्त्यावर दुचाकी व प्रवासी रिक्षाच्या झालेल्या अपघातात सोमवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र त्यातील फक्त पुरुषाची ओळख पटली होती. तर दोन्ही महिलांची ओळख मिळत नव्हती. अखेर मंगळवारी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी तपास करीत त्यांचा शोध घेतला आहे. मयत महिला ह्या जळगाव येथील छ. शिवाजी नगर येथील असून त्या बहिणीकडे बडवाणी येथे राहत होत्या तर त्या मयत पुरुषाच्या नातेवाईकच आहेत.
कानळदा रस्त्यावर दुचाकी व प्रवासी रिक्षाचा सोमवारी २६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विचित्र अपघात झाला होता. या अपघातामध्ये रिक्षातील सहा ते सात जण जखमी झाले होते तर दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिघांचा सोमवारी मृत्यू झाला होता. यातील पुरुषाची ओळख पटून तो पिंप्री ता. धरणगाव येथील महेश जोशी असल्याचे निष्पन्न झाले होते.
तर त्याच्यासोबत असणाऱ्या ४० वर्षे व १५ वर्षीय तरुणीची मात्र ओळख पटली नव्हती. तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय नयन पाटील, कर्मचारी नरेंद्र पाटील, अनिल फेगडे, अनिल मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. महेश जोशी याच्या मोबाईल लोकेशनवरून थेट चोपड्यापर्यंत आणि मध्य प्रदेशातील काही गावांपर्यंत देखील महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले होते. भुसावळ येथील याच वयाच्या वर्णनाच्या दोन महिलांचा देखील पोलिसांनी तपास केला होता त्या महिलांच्या नातेवाईकांनाही बोलावले होते मात्र या महिला त्यांचे नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान मंगळवारी रात्री मयत महिलेच्या बहिणी आणि पती देखील शोधण्यात तालुका पोलिसांना यश आले. त्यांना रात्रीच दोघांचे मृतदेह दाखवून ओळख पटवण्यात आली. सदरहू महिला ही गायत्री उर्फ सिमा प्रवीण कुलकर्णी (वय ३२ वर्षे) आणि तरुणी ही नंदिनी प्रवीण कुलकर्णी (वय ११, दोन्ही रा. छ. शिवाजी नगर, जळगाव, ह.मु. बडवाणी, मध्य प्रदेश) या असल्याचे निष्पन्न झाले. त्या मयत महेश जोशी याचे नातेवाईकच असल्याचे दिसून आले आहे.
मयत गायत्री या त्यांची बहीण यांच्याकडे काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील बडवाणी येथे राहत होत्या. तर महिलेचा पती प्रवीण कुलकर्णी हा जळगावात रिक्षा चालक असून, अपघाताबद्दल त्याला माहिती होती. मात्र त्याने रुग्णालयात कुठलीच ओळख दाखवली नाही अशी माहिती महिलेच्या बाहेरच्या मंडळींनी दिली. त्यामुळे त्यांनी महिलेच्या पतीवर संताप व्यक्त केला. महिलेचे माहेर हे चोपडा शहरातील आहे. त्यांना पती, मुलगा मंदार, तर माहेरी आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
मयत गायत्री ह्या त्यांची मुलगी नंदिनी हिला घेऊन जळगावात लाना शाळेत शैक्षणिक कामासाठी मयत महेश जोशी याच्यासह येत होते. दुर्दैवाने त्यांचा कानळदा रस्त्यावर अपघात होऊन त्यात उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे. दोघांचीही ओळख पटल्यामुळे तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तपासामध्ये यश मिळाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दोघांचेही मृतदेह देण्यात आले आहे.