सर्व पर्यटक मुक्ताईनगरचे रहिवासी
बचाव कार्यात स्थानिकांसह जिल्हा प्रशासनाला अभूतपूर्व यश
जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सुकी गारबर्डी धरण परिसरात सुकी धरणाच्या सांडव्याच्या खाली नदीपात्रामध्ये नऊ जण अडकून पडले होते. या नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. हे सर्व ९ जण मुक्ताईनगर येथील रहिवासी आहेत.
सुकी गारबर्डी धरण येथे पर्यटनासाठी मुक्ताईनगर येथील नऊ जण गेले होते. यामध्ये अतुल प्रकाश कोळी ( वय २०) विष्णू दिलीप कोलते (वय १७), आकाश रमेश धांडे (२५), जितेंद्र शत्रुघ्न कुंडक (३०), मुकेश श्रीराम धांडे (१९), मनोज रमेश सोनवणे (२८), लखन प्रकाश सोनवणे (२५), पियुष मिलिंद भालेराव (२२), गणेश सिंग पोपट मोरे (२८) या सर्व नऊ पर्यटकांची सुटका करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे.
त्यांना पाल येथील रहिवासी इमरान शहा रतनशहा, संतोष दरबार राठोड, परिसरातील रतन भंगी पावरा, तारासिंग पावरा, सिद्धार्थ भिल यांनी बचाव कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशासनातर्फे रावेर यावल लोकसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशनची टीम, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदींचे सहकार्य या बचाव कार्यात लाभले आहे.
सध्या नदी,नाले, तलाव, धरण पावसामुळे तुडुंब भरत आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी जाताना खबरदारी घ्यावी. नदीमध्ये, तलावामध्ये उतरण्याचा मोह टाळावा, असे आवाहन “केसरीराज” तर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.