एरंडोल तालुक्यात निपाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- नापिकीमुळे आणि उसनवारीचे पैसे कसे द्यावे, या विवंचनेतून एका २६ वर्षीय शेतकऱ्याने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना एरंडोल तालुक्यातील निपाणे येथे रविवारी दि. ८ रोजी उघडकीस आली. कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रीराम सखाराम राठोड (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीराम यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, लहान भाऊ, मुलगी असा परिवार आहे. श्रीराम राठोड यांना एक नऊ महिन्यांची मुलगी आहे. मागील वर्षी शेतात कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, याचे नेहमी विचार करत असे. वृद्ध आई आणि पत्नी श्रीराम राठोड यांना धीर देत होते, परंतु ते नेहमी चिंतेत राहत असे.(केसीएन)श्रीराम सखाराम राठोड यांनी दि. ८ रोजी सकाळी घराला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब श्रीराम राठोड यांच्या पत्नीला दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. कासोदा पोलिस स्टेशनला या घटनेची खबर देण्यात आली.कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.