जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – येथील माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची नाशिक येथील व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या या व्यापाऱ्यांनी उसनवारीने घेतलेले २४ कोटी ६३ लाख १६ हजार रूपये परत केले नाही. तसेच पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केले. म्हणून पोलीस ठाण्यात नाशिक येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार ईश्वरलाल जैन (वय ७६, रा. बालाजी पेठ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक येथील अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया आणि ईश्वरलाल जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करायचा आहे, पैशांची खूप निकड आहे असे सांगितले. कटारिया यांनी २०१०-११ व २०१४-१५ दरम्यान वेळोवेळी ११ कोटी आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० रूपये असे एकुण उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम कटारिया यांनी परत केली. तरीही एकुण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रूपये कटारिया यांच्याकडे घेणे बाकी होते.
व्यापारी कटारिया हे २ ऑक्टोबर २०१५ रोजी राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री यांना सोबत घेवून सराफा बाजारातील कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी पैसे परत करण्याची पुन्हा मुदतवाढ मागितली. यासाठी कटारिया यांनी जैन यांना एक करारनामा करुन घेण्याचे सांगीतले. त्या कागदपत्रांवर जैन यांनी सह्या केल्या. त्यानंतर मानराज मोटर्स यांना पैसे देण्याचे सांगून जैन यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे पैश्यांची मागणी केली.
याचवेळी नाशिक येथील जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते, त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्या कागदपत्राच्या आधारे ईश्वरलाल जैन यांची फसवणूक झाली आहे. ईश्वरलाल जैन यांना हे माहित झाल्यावर त्यांनी शनिपेठ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकच्या अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशीष अशोक कटारीया, सतीष धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.







