चौकशीच्या नावाखाली ; वसतिगृहातील महिलांशी अनैतिक कृत्य

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव मधील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार करत पोलीसांनी दिवे लावले आहेत. यासंबंधी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेचे पडसाद विधीमंडळात उमटले असुन विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले आशादिप महिला वसतिगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात असल्याची ओरड येत होती. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून मनमानी कारभार करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करतात. सोमवारी वसतीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही. त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सांगा? कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वसतिगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत होते. दरम्यान, आशदिप वस्तीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







