नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असूनही अपयश येत असल्याचे दिसत आहे. यासंबंधीचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधीच मोदी सरकारला दिला होता.
करोनाचे संकट गंभीर असल्याचे त्यांनी मोदी सरकारला सांगितले होते. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करत म्हणाले कि, करोना व्हायरस गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने निराकरण होणार नाही. यावर लवकरात-लवकर उपाय काढला नाहीतर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. पण, सरकार शुद्धीत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. ‘देशाचे आरोग्यमंत्री सांगत आहेत की, करोना व्हायरसचं संकट पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात आहे. हे म्हणजे टायटॅनिकचा जहाजाच्या कॅप्टननं जहाजातील प्रवाशांना घाबरू नका असं सांगण्यासारखं आहे. जसं की जहाज बुडण्यासारखं नाही. या संकाटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं कृती योजनेची अमलबजावणी करण्याची वेळ आली आहे,’ असं राहुल गांधी सरकारला उद्देशून म्हणाले होते.