नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संकटामुळे 18 मार्चपासून बंद असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प एक जुलैपासून सुरू होत असून, हे पर्यटन केवळ बफर क्षेत्रातच असणार आहे. कोअर झोनमध्ये पर्यटन पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.

ताडोबाच्या पर्यटनावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. उन्हाळ्यातील महत्त्वाचा हंगाम कोरोनामुळं वाया गेला. त्यामुळं इथले रिसॉर्टस, छोटे हॉटेल्स, टुरिस्ट गाईड या सगळ्यांचा व्यवसाय बुडाल्यानं अनेकांवर आर्थिक संकट आलं. पर्यटनावर आधारित व्यवसायात काम करणाऱ्या हजारो लोकांवर उपासमारीची पाळी आली. ही परिस्थिती बघता इथल्या होम स्टे संघटनेनं आणि स्थानिकांनी प्रकल्प अंशतः तरी सुरू करावा, अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती. त्याला आता यश आलं आहे.
एक जुलैपासून ताडोबाच्या बफर क्षेत्रातील पर्यटनाला मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या एकूण 13 प्रवेशद्वारातून रोज पर्यटक वाहनं सोडली जाणार आहेत. एका द्वारातून रोज सकाळी सहा आणि सायंकाळी सहा अशी बारा वाहनं सोडली जाणार आहेत. या निर्णयामुळं पुन्हा एकदा ताडोबात चेहलपहेल निर्माण होईल, यात शंका नाही, असे एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.







