सातारा (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील बनपुरी येथे क्वारंटाइनमधील म्रुत झालेल्या महिलेचा अहवाल करोना पाँझिटिव्ह आल्याने करोनामुळे आतापर्यंत म्रुत झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा २० जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आल्याने एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता १६६ झाली आहे. तर १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
काल दि. 19 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार सातारा जिल्ह्यात मुंबई, ठाणे व इतर भागातून प्रवास करुन आलेले सातारा तालुक्यातील वारणानगर येथील ३, वर्णे येथील १, रायगांव पोखरी येथील १, कोरेगाव तालुक्यातील न्हावी येथील १ व वेळू येथील १, खंडाळा तालुक्यातील अहिरे १ व अजनुज गावातील १, जावली तालुक्यातील वरोशी गावातील १, खटाव तालुक्यातील मायणी येथील १, आवळे पठार, डिस्क्ळ येथील १, पाटण तालुक्यातील बनपुरी येथील १, शिरळा येथील १, कराड तालुक्यातील म्हासोली येथील ४, खालकरवाडी चरेगाव येथील १ व शामगाव येथील १, अशा एकूण २० जणांचे अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये १९ ते ७० वर्षे वयोगटातील १५ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.
उपरोक्त अहवालात वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या ४३ वर्षीय मृत महिलेचा अहवाल करोनाबाधित आला आहे. उर्वरित १९ पैकी ४ जणांना मध्यम स्वरुपाची तर १५ जणांना लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ३७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ५५, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ११, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील ११ व कोरेगाव येथील १५ अशा एकूण १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कृष्णा मेडीकल कॉलेजमधीलल 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे एकूण १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
दि.१९ मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १०, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ५२ अशा एकूण ६२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १६६ झाली असून यापैकी ९० जण उपचार घेत अआहेत. ७३ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.