मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही. लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे मदतनिधी जाहीर का करत नाही?, अशी विचारणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन केली आहे.
कोरोनामुळे प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असताना सरकारकडून त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणात येऊ नका असे आवाहन करीत राणे यांनी सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे. कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे!. ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.