पाचोरा तालुक्यात काळाचा क्रूर घाला : अमरावती जिल्ह्यात शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- ज्या घरात आठ दिवसांवर लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता काळीज चिरणारा आक्रोश ऐकू येत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करून परतताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात उपवर नवरी मुलगी आणि तिच्या चुलत वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी शिखा विनायक बेलसरे हिचे लग्न ८ मे रोजी होणार होते. २१ एप्रिल रोजीच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. लग्नापूर्वी कुलदैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी शिखा, तिचा भाऊ शुभम बेलसरे, चुलत भाऊ सुनील मानकर आणि चुलत वहिनी मीना मानकर हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर गेले होते.
देवीच्या चरणी लग्नाची पहिली पत्रिका ठेवून, मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर शिखाने वडिलांना फोन करून “दर्शन नीट झाले” असे आनंदाने सांगितले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. परतीच्या प्रवासात असताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारचे टायर अचानक फुटले. वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
मृतांमध्ये शिखा विनायक बेलसरे (नवरी मुलगी), मीना मानकर (चुलत वहिनी) यांचा समावेश आहे. शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, मात्र शिखा आणि मीना यांची प्राणज्योत मालवली होती. लग्नाच्या तयारीने नटलेल्या घरात आता अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ आल्याने संपूर्ण अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.









