पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नांद्रा येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा गिरणा नदीपात्रात पोहतांना बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हर्षल संजय तावडे (वय-१७ , रा. नांद्रा ता. पाचोरा ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. आज तो दुपारी मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता . पोहतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. हनुमंतखेडा येथील नाविकांनी शोध घेवून मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. उशिरापर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती .
मयत हर्षलने जळगाव येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. संजय तावडे यांच्या दोन मुलांपैकी हर्षल लहान होता. त्याच्या वडीलांचा शेतीचा व्यवसाय आहे अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. हर्षल हा अभ्यासात हुशार होता. अशी माहिती नातेवाईकांनी दिली