जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी परिसरातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- शेंदुर्णी येथील विसदेवळीजवळील सोनद नदीवर बांधलेल्या पुलावरून पाय घसरून नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
यशवंत कडोबा सोनवणे असे मयत बालकाचे नाव आहे. येथील कोळीवाडा भागातील विसदेवळी मंदीराजवळ मोराड रस्त्याकडे जाण्यासाठी सोनद नदीवर लहान पुल बांधण्यात आला आहे. दोन दिवसांपासून अजिंठा डोंगर आणि परीसरामध्ये पाऊस पडत असल्याने नदीमधील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे पुलामधील पाईपामध्ये घाण अडकल्याने मोरीच्या वरतून पाणी वाहत होते. ७ वर्षीय यशवंत बारा वाजेच्या सुमारास मोरीवरून जात असतांना अंदाज न आल्याने पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
ग्रामस्थांनी तात्काळ शोध सुरू केला. परंतु, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने यशवंत वाहत ५०० मिटर अंतरावर शनिमंदीरासमोरील नदीपात्रापर्यंत वाहत गेला. तसेच या भागातील पात्र खोल असल्याने शोध घेतांना अडचणी आल्या.(केसीएन)अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने शनिमंदीरासमोरील पात्रात सापडला असता नाका तोंडातून पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी यशवंतला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.