जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीचे मूल्यांकन आज गुरूवार दि.२५ ऑगस्ट रोजी नॅक पिअर टीमद्वारे पूर्ण झाले. सायंकाळी निरोपाच्या सभेत टीमचे चेअरमन आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. दिलीप चंद्रा नाथ, यांनी मूल्यांकन अहवाल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला.
दि. २३ ऑगस्ट पासून विद्यापीठात नॅक पीअर टीम दाखल झाली होती. आज या समितीच्या पाहणीचा शेवटचा दिवस होता. सकाळी या समितीने विद्यार्थी वसतिगृह, कर्मचारी निवासस्थान, उपहार गृह, प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग यांना भेटी दिल्या.त्यानंतर सायंकाळी सिनेट सभागृहात निरोपाची सभा झाली. यावेळी पीअर टीमचे चेअरमन प्रा. दिलीप चंद्रा नाथ, सदस्य समन्वयक प्रा. प्रशांत कुमार (बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी), सदस्य प्रा. के. जयप्रसाद (केंद्रीय विद्यापीठ, कसारागोड, केरळ), प्रा. अभय आनंद बौराई (हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल, केंद्रीय विद्यापीठ, उत्तराखंड) तसेच कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे व प्रा. समिर नारखेडे हे मंचावर उपस्थित होते.
या सभेत प्रास्ताविक प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठातील सर्व घटकांनी सांघिक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या बळावर नॅकला आत्मविश्वासाने सामोरे जाता आले याचा आनंद असल्याचे सांगितले. चेअरमन प्रा. दिलीप चंद्रा नाथ यांनी देखील मनोगत व्यक्त केले आणि मूल्यांकनाचा सिलबंद अहवाल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन यांनी केले. प्रा. समिर नारखेडे यांनी आभार मानले.