मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा फोन क्रमांक जाहीर
जळगाव : तापी व पूर्णा या नद्यांच्या जलपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या लगतच्या जळगाव जिल्ह्यातील गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शनिवारी दुपारपासून पुन्हा पावसाचे आगमन झाले. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता.
तापी व हतूनर या नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येऊ शकतो. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांत सर्व यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नद्या, उपनद्या, धरणे, तलाव, कालवे, खदानी, नाले, धबधबे येथे पुराचे पाणी आणि अतिवृष्टी, ढगफुटीमुळे जलपातळी वाढून नद्यांच्या काठावरील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागनिहाय नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच तालुकानिहाय शोध बचाव साहित्य, रबर बोट, बचाव पथकातील आपदा मित्र, पट्टीचे पोहणारे यांनाही सतर्क राहण्याचे निर्देश आहेत. आपत्कालीन शोध मदत व बचावकार्यासाठी मदत लागल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अधिकाऱ्यांशी (९३७३७८९०६४) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.