जळगावातील अविनाश अहिरे खूनप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खोटे नगर येथे मंगळवारी ६ जून रोजी झालेल्या अविनाश अहिरे खून प्रकरणी पोलिसांनी तिघही संशयित आरोपींना अटक केली आहे. सदर संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महेश पोपट सोनवणे (वय ४३, चंदू आण्णा नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. महेश सोनवणे आणि मयत अविनाश निंबा अहिरे (ह. मु. कुसुंबा रा. मूळ मालेगाव) हे दि. ६ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रेनॉल्ट कंपनीची चारचाकी वाहन (क्र एमएच १९ इए ०४५१) हिच्याने जळगाव ते बांभोरी रोडवरील हॉटेल साई पॅलेस येथे जेवणासाठी गेले होते. तेव्हा सदर ठिकाणी संशयित आरोपी दिपक प्रकाश पाटील हा देखील अविनाश अहिरे याची मोटार सायकल घेवुन जेवणासाठी आलेला होता.दीपक पाटील आणि अविनाश हे एकत्र मोबाईल टॉवरचे काम करतात. तेव्हा हॉटेलमध्ये जेवण करीत असतांना अविनाश अहिरे व दिपक प्रकाश पाटील अशांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिघांनी सदर हॉटेलमध्ये जेवण करुन कारने खोटेनगर स्टॉप जवळ एका आंडा भुर्जीच्या गाडीजवळ आले.
सदर ठिकाणी गाडी लावून गाडीत गप्पा मारत बसले होते. तेव्हा ०९.३० वाचे सुमारास दिपक पाटील हा देखील सदर ठिकाणी आला. त्यावेळी अविनाश अहिरे याने दिपक पाटीलकडे त्याच्या मोटार सायकलची चावी मागीतली.त्यावेळी पुन्हा अविनाश अहिरे व दिपक पाटील यांच्यात मोटार सायकलीची चावी मागण्यावरून वाद सुरु झाला. त्यावेळी फिर्यादीचे ओळखीचे व दिपकचे मित्र संशयित साहील खान रशीद खान पठाण (वय २२) व अमोल गवई (वय २३, रा. पिंप्राळा) असे आले. त्यावेळी अविनाश व दिपक यांचेत होत असलेला वाद पाहुन साहिल व अमोल अविनाश यास म्हणाले की. तु माझ्या मित्राला काय शिव्या देतो आहेस. त्यावेळी अविनाश हा त्या दोघांना म्हणाला की, तुमचा आमच्या दोघांच्या भांडणात बोलण्याचा काहीच संबंध नाही, तुम्ही आमच्या भांडणात का नाक खुपसत आहात. निघा इथून असे मयत अविनाश अहिरे दोघांना बोलला.
त्या वरून राग आल्याने संशयित दीपक पाटील याने अमोल गवई, साहिल खान पठाण यांना सांगितले की, याला आज जिवंत सोडू नका. त्यावेळी दीपक पाटील व साहिल खान याने अविनाश याला धरून ठेवले. अमोल गवई याने त्याच्याकडील धारदार वस्तूने अविनाश अहिरे पोटात व पाठीत वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत फिर्यादी महेश आणि ओळखीचा राम कुकडे यांनी अविनाश याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचाराअंती बुधवारी सकाळी ६ वाजता मयत घोषित करण्यात आले.
त्यानुसार तालुका पोलीस स्टेशन आणि एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे फिरवून संशयितांना अटक केली. दीपक पाटील याला पहिलेच अटक करण्यात आली. तर पिंप्राळा परिसरात फिरताना अमोल गवई आणि साहिल खान पठाण यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.