खान्देश केटरिंग असोसिएशनच्या सेवकांचे कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : येथील खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे पाचोरा तालुक्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मयत व्यक्तींच्या नातेवाईक व अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भोजन, पाण्याच्या मोफत व्यवस्था करण्यात आली होती. या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देत सन्मान केला आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव परिसरात रेल्वे दुर्घटनेत १२ जण मयत झाले होते. परिस्थिती गंभीर होती. एकीकडे प्रशासनाची तारांबळ सुरु होती. मात्र घटनेतील जखमी, मृतांचे नातेवाईक यांचेसह त्यांचेसाठी शासकीय कार्यवाही करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे भुकेमुळे हाल होऊ नये म्हणून सरकारी रुग्णालयात खान्देश केटरिंग असोसिएशनने तत्काळ त्यांच्यावतीने मोफत जेवण, पाण्याची व्यवस्था करून दिली.
त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी कार्यालयात असोसिएशनचे सचिव रतन सारस्वत यांनी हा सन्मान स्वीकारला. मोफत भोजन व्यवस्थेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, सचिव रतन सारस्वत, सहसचिव दिनेश टाटीया, रामचंद्र महाराज, शिवा तिवारी, सुनील बियाणी, महावीर कुमावत, मोहन महाराज आदींनी परिश्रम घेतले.