जळगाव तालुक्यातील घटना, आत्महत्या की घातपात ?
हत्या केल्याच्या संशयावरून एकाला जमावाने चोपले
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कंडारी येथील २४ वर्षीय तरुणाचा वाघुर धरणातील पाटाच्या चारीमध्ये खराब झालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह संध्याकाळी आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल युवराज भिल (वय २४, रा. रायपूर कंडारी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वडिलांसह राहतो. मोठ्या भावाचे लग्न झाले असून तो दुसरीकडे राहतो. तर बहिणीचे लग्न झाले आहे. रविवारी रात्री गावातील काहीं लोकासोबत तो दारू पीत बसला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा शोध नातेवाईकांनी सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे गुरुवारी नातेवाईक नशिराबाद पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी गुरुवारी संध्याकाळी वाघुर धरणाजवळ काही मेंढपाळ लोकांना राहुलचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी एमआयडीसी आणि नशिराबाद दोन्ही पोलीस स्टेशनचे एपीआय घटनास्थळी पोहोचले होते. दोघेही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी हलविला. मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीच तेथे असून तो कुजलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला आहे.
दरम्यान त्याला गावातील जयराम कोळी याने ठार केले असावे या संशयावरून गावकऱ्यांनी जयराम कोळी याला चोप देत पब्लिक मार दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सोडवले आणि जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तसेच संशयितांची देखील चौकशी सुरू आहे.
दरम्यान त्याचा मृतदेह पाटाच्या चारीत पाईपामध्ये आढळून आल्यामुळे त्याचा घातपात झाला असावा असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. रविवारी बेपत्ता होण्याआधी तो जयराम भील, बादल परदेशी व वराडसिमचा एक जण अशा तिघांसोबत दारू पीत बसला होता. त्यानंतरच तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या तिघांवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.