भुसावळ तालुक्यात उघड झाली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : नेपाळ बस दुर्घटनेतील मृतदेहांचे शव जळगावात आले. शासकीय प्रक्रिया झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. मात्र यात मृतदेह बदलले गेल्याने काही काळ वरणगाव व भुसावळात गोंधळ उडून नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला होता.
नेपाळ बस दुर्घटनेमध्ये भुसावळ येथील भारंबे परिवारातील सुलभा पांडुरंग भारंबे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह परिवारातील गणेश पांडुरंग भारंबे, मीनल गणेश भारंबे, परी गणेश भारंबे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे वरणगाव येथील सागर कडू जावळे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याही परिवारातील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान मृतदेह गोरखपूर येथून जळगाव विमानतळावर एअर ॲम्बुलन्सने आले.
त्यावेळेला कुठल्याही नातेवाईकाला विमानाजवळ सोडण्यात आले नव्हते. मात्र पेट्यांवर जशी नावे होती त्याप्रमाणे शव रुग्णवाहिकेत ठेवण्यात आली. त्यानुसार सागर जावळे नाव लिहिलेली पेटी ही भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गेली. तर सुलभा भारंबे नाव लिहिलेली शवपेटी भुसावळ शहरात गेली.

मात्र कुटुंबियांनी पेटी उघडताच दोघेही ठिकाणे मृतदेह बदली झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.तर नाहक मनस्ताप झाल्यानंतर मृतदेह पुन्हा एकमेकांच्या घरी पाठवण्यात आले होते. ऐन पावसामध्ये मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना व रात्र भरपूर झालेली असताना देखील नातेवाईकांनी संयम पाळलेला दिसून आला.