वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात अंधार, आरोग्य सेवेच्या बदल्यांनी आणले जमिनीवर
जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे आपल्याच खात्याकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याच जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) आरोग्य सेवा विभागाच्या बदल्यांमुळे मोठे अडचणीत आले असून प्रशासनाची मोठी तारांबळ उडत आहे. चिंचोली येथील प्रस्तावित मेडिकल हबला सुरुवात झाली असली तरी आहे त्याच मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचे आज तीन तेरा वाजलेले आहेत. गुरूवारी १५ जून रोजी तर रुग्ण व नातेवाईकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
परिचारिका नसल्यामुळे कक्ष ओसाड पडत असून केवळ इमर्जन्सी रुग्णांनाच दाखल करण्याकडे डॉक्टरांनी भर दिला आहे. तसेच, काही विभाग बंद पडण्याच्या मार्गावर असून काही विभागात मनुष्यबळ नसल्याने गोंधळ उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जीएमसीमध्ये येऊन मनुष्यबळाचा गंभीर झालेला प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. आरोग्य सेवेच्या आयुक्तालयाने काही दिवसांपूर्वी १२९२ डॉक्टरांच्या बदल्या केल्या. यात जिल्ह्यातील २७ डॉक्टरांचा समावेश आहे. जीएमसीमधील २ ते ३ सीएमओ डॉक्टरांची देखील यात बदली झाली आहे. तसेच, गट क श्रेणीतील बदल्यांनी तर प्रशासकीय कारणाने ४४ परिचारिकांसह अनेक तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचे आदेश काढल्याने मोठा धक्का जीएमसीला बसला आहे.
जीएमसी मधून २ फिजिओथेरपिस्ट दुसऱ्या जिल्ह्यात जाणार असल्याने तो विभागच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच, दररोजच्या ६०० ते ६५० रुग्णांच्या ओपीडीमधील औषधी विभागात एक फार्मासिस्ट मागील महिन्यात निवृत्त झाले. तर एक फार्मासिस्ट १५ दिवसात निवृत्त होणार आहे. तसेच, एका फार्मासिस्टची बदली मोहाडी येथे झाली. जुने असणारे तिन्ही फार्मासिस्ट गेल्यावर आता केवळ ४ ते ६ कंत्राटी फार्मासिस्टवर औषधी विभाग चालविला जात आहे. गुरुवारी तर तीनपैकी २ खिडक्या सुरु होत्या. त्यामुळे ओपीडीची वेळ संपल्यावरही औषधी वितरण सुरूच होते. रुग्णालयातून क्ष किरण विभाग येथून २, रक्ततपासणी प्रयोगशाळा, समाजसेवा विभाग येथून प्रत्येकी एका जणाचाही समावेश असल्याने तेथे मनुष्यबळ लागणार आहे.
रुग्णालयातील ७२ पैकी ४४ परिचारिका यांना आरोग्य सेवा विभागाने प्रशासकीय बदल्या दिल्याने त्यांना तत्काळ पदस्थापने ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. यात ६ ते ७ मोहाडी स्त्री रुग्णालयात तर इतर परिचारिका ह्या जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात रुजू होत आहे. त्यामुळे जळगावच्या “सिव्हिल हॉस्पिटल”ला मोजक्याच २८ परिचारिका शिल्लक राहिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कक्षात परिचारिका नसल्याने कक्ष ओसाड पडत आहेत. रोजचे रेकॉर्डदेखील अपडेट होत नाही. परिचारिकाच नसल्याने कोणाच्या भरोशावर रुग्ण दाखल करायचे ? म्हणून केवळ इमर्जन्सीच रुग्ण दाखल करण्यावर भर दिला जात आहे. जीएमसी, जळगावला परिचारिकांच्या मंजूर ४०० पैकी केवळ ४ च परिचारिका मिळाल्या आहेत. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला पण जीएमसीला वैद्यकीय शिक्षण विभागाकडून परिचारिकाच मिळत नाहीत.
आज सिटी स्कॅन विभाग देखील बंद पडला आहे. जुन्यापैकी केवळ दोनच सीएमओ उरल्याने वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयातील ४ ते ५ आरएमओ यांच्याकडून कर्तव्य पार पाडले जात आहेत. एकूणच आरोग्य सेवा विभागाच्या बदल्यांनी जीएमसी प्रशासनाला जमिनीवर आणून सोडले असून रुग्णालय चालविणे कठीण झाले आहे. डॉक्टर्स मेटाकुटीला आले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लक्ष घालून हि गंभीर समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.