जळगाव शहरातील कुटुंबियांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : येथील ३१ वर्षीय महिलेची हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ६६ लाख ४० हजार ५ रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
माधुरी अनिल चांदोरीकर (वय ३१,रा. रासने नगर, सावेडी, अहमदनगर) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. जळगाव शहरातील हॉटेल चाय शाय बारमध्ये दि. ३१ जुलै २०२३ ते दि. १ मार्च २०२५ पावेतो दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शनिवारी दि. १ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला आहे. (केसीएन)फिर्यादी माधुरी चांदोरीकर यांना संशयित आरोपी आशा कमलेश रूपाणी, कमलेश हेमचंद्र रूपाणी, दीपेश कमलेश रूपाणी, आश्लेष कमलेश रूपाणी (सर्व रा. खामगाव जि. बुलढाणा, ह. मु. पर्पल व्ह्यू अपार्टमेंट, शिवम कॉलनी, जळगाव) आणि आकाश सिद्धू वर्मा (वय ३२) यांनी हर्बललाईफ कंपनीत गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले.
दि. ३१ जुलै २०२३ ते आज पावेतो फिर्यादी माधुरी चांदोरीकर, त्यांचे पती व नातेवाईक यांच्याकडून तब्बल ८६ लाख ६४ हजार ९९९ रुपये इतकी रक्कम बँक खाते, सीडीएम मशीन आणि रोख स्वरूपात संशयित आरोपींनी घेतले आहेत. तसेच फिर्यादीला २० लाख २४ हजार ९९४ रुपयांचा नफा परतावा म्हणून दिला आहे.(केसीएन)परंतु फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीवर पुढील अपेक्षित परतावा मागितला असता फिर्यादीला संशयित आरोपींकडून परतावा देण्यात आला नाही. फिर्यादीची मुद्दल ६६ लाख ४० हजार ०५ रुपयांची रक्कम परत न करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. गुंतवणूक करून अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळ्या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे.