जळगाव (प्रतिनिधी ) सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसात परिसरात ओलसरपणा वाढून किंवा वीज सुरक्षेची योग्य दक्षता न घेतल्याने वीज अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची साधणे हाताळतांना पुरेशी दक्षता घेऊन वीज अपघात टाळावेत. असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलात जळगावसह धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या दिवसात वादळ-वारा आणि अन्य काही कारणाने वीज यंञणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडत असतात. त्यावर मात करुन तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना म्हणून अगदी उपविभागीय स्तरावर वीजयंञना दुरुस्ती पथके कार्यान्वीत ठेवलेली आहेत. शिवाय परिमंडलात अपघातविरहित सेवा देण्यासाठी महावितरणकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.
नागरिकांनीही वीज सुरेक्षेचा भाग म्हणून आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयएसओ मानांकित वायर आणि उपकरणांचाच अर्थात सुरेक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या साधनांचा वापर करावा. घरात किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी अधिकृत विद्युत ठेकेदारांकडूनच संचमांडणी करुन घ्यावी. घरात किंवा घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी लोंखडी तारेऐवजी दोरीचा वापर करण्यात यावा. ती वीज विद्युत तारांपासून सुरक्षित अंतरावर असावी. घरातील जूने किंवा उंदरांनी कुरतडलेले वायर बदलून घ्यावे किंवा तसे तुटलेले वायर इन्सुलेटेड टेपने सुरक्षितपणे टेप करुनच वापरावे. विजेचे स्विचबोर्ड ओलसर भिंतीवर बसविण्याऐवजी ते भिंतीवर कोरड्या ठिकाणी बसविण्यात यावेत. शेतशिवारात विजेच्या खांबाशेजारील तणावास जनावरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली जनावरांचे गोठे, कडब्यांच्या गंजी रचण्यात येवू नयेत. ओल्या हातानी ईलेक्ट्रीक मोटारीच्या स्टार्टरला किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करु नये. रस्त्यावर एखाद्या मोर्चा-आंदोलनात किंवा एखाद्या उत्सवात हाताळण्यात येणारे लोखंडी पाईप लावलेले झेंडे वीज तारांच्या संपर्कात येणार नाहीत, आदी बाबींची काळजी घ्यावी. शिवाय अपघात विरहित वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी अधिकृतरित्या वीज जोडण्या घेवून वीज वापर करावा.
विजेसंबंधी ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर महावितरणच्या संबंधीत उपविभागीय कार्यालयात तसेच १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोलफ्री क्रमांकावर किंवा जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांनी ७७९८१२०१५५, धुळे-७८७५७६६७६३ व नंदूरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५५४५४३ या नियंञण कक्षांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.