जळगाव शहर महानगरपालिकेचा मोठा निर्णय
जळगाव ( प्रतिनिधी ):- शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बाजारपेठांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार, येत्या शुक्रवार, ६ मार्च आणि शनिवार, ७ मार्च रोजी शहरातील सर्व मनपा मार्केट आणि त्यांच्या परिसराची १००% साफसफाई करण्यासाठी विशेष ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापौर दीपमाला काळे यांनी
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार कडक शब्दात आदेश दिलेल्या सूचनांनुसार, जळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय मधुकर पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. या मोहिमेत मनपाचे कायम कामगार आणि बी.व्ही.जी. इंडिया लि. पुणे या मक्तेदाराचे कामगार संयुक्तपणे सहभागी होणार आहेत.
असे आहे नियोजित वेळापत्रक
ही मोहीम दोन दिवसांत विभागली गेली असून दररोज सकाळी ७ वाजेपासून कामाला सुरुवात होणार आहे. ६ मार्च रोजी महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवर, रामलाल चौबे मार्केट, जुने व नवीन बी.जे. मार्केट, धर्मशाळा मार्केट, भास्कर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भोईटे मार्केट, शिवाजी नगर दवाखाना परिसर, रेल्वे स्टेशन चौक मार्केट, शामाप्रसाद मुखर्जी मार्केट, लाठी शाळा परिसर, नानीबाई अग्रवाल आणि गेंदालाल व सोमाणी मार्केट तर ७ मार्च रोजी सावखेडा मार्केट (पिंप्राळा हुडको), बाबासाहेब आंबेडकर मार्केट, छत्रपती शाहू महाराज मार्केट (जुने व नवीन), शाहू महाराज दवाखाना परिसर आणि वालेचा मार्केट साफ होईल.
कामचुकारपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई
या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रमेश वामन कांबळे आणि कुणाल राजेश बारसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व आरोग्य निरीक्षक आणि युनिट प्रमुखांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी प्रत्यक्ष जागेवर कामगारांची हजेरी घ्यावी.
विशेष म्हणजे, स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे जी.पी.एस. फोटोसह अहवाल आणि १००% साफसफाई झाल्याचे प्रमाणपत्र मुख्य स्वच्छता निरीक्षकांमार्फत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शहरातील बाजारपेठा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.








