जळगाव शहरातील अजिंठा चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पुढच्या चौकात सोडतो, असे सांगत कारमध्ये बसवून वृद्धाच्या खिशातून २५ हजारांची रोकड लांबविण्यात आली. ही घटना १ ऑगस्ट रोजी कालिंका माता चौफुली ते अजिंठा चौफुलीदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित अर्शद शेख रज्जाक (३०, रा. गेंदालाल मिल) व अतऊर रहेमान मोहम्मद सलीम (३४, रा. गेंदालाल मिल) या दोन जणांना फातेमा नगरातून अटक केली.
भास्कर शंकर पाटील (७०, रा. पहूर, ता. जामनेर) यांनी तक्रार दिली आहे. जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी भास्कर पाटील हे त्यांची चारचाकी दुरुस्ती करण्याकरिता जळगावला आले होते. त्यांनी कालिंका मंदिर परिसरात एका गॅरेजवर वाहन दुरुस्तीसाठी लावले. त्यानंतर ते अजिंठा चौफुलीकडे पायी जात असताना एक कार त्यांच्याजवळ थांबली व चालकाने पाटील यांना पुढच्या चौकात सोडतो, असे म्हणत कारमध्ये बसण्यास सांगितले. कारमध्ये बसल्यानंतर त्यांच्या खिशातून बाजूला बसलेल्या एकाने २५ हजार रुपयांची रोकड हातचलाखी करीत लांबवली. त्यानंतर पाटील यांना अजिंठा चौफुलीवर उतरवून दोघे पसार झाले होते. रोकड चोरीस गेल्याचे समजताच पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. .एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक केली.