जळगाव तालुका पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील निमखेडी शिवारात एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या तीव्र वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय-३०) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे भावाने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाले आहे. हि घटना रविवार, १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने दोघांनाही अटक केली आहे.
मयत सागर सोनवणे हा आई-वडील आणि भावासोबत याच परिसरात वास्तव्याला होता. गेल्या जवळपास चार वर्षांपासून सागरचे परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे कुटुंबात आणि परिसरात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, याच महिलेच्या कारणावरून सागर सोनवणे आणि निमखेडी येथील रहिवासी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे यांच्यात वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रविवारी सायंकाळी ६ वाजता अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघेही रा. निमखेडी) यांच्यात सागरसोबत पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली.
यावेळी अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरला धमकावले होते. “महिलेचा नाद सोड नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकी त्यांनी सागरला दिली होती. सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच, रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. निमखेडी परिसरातील राम मंदिराच्या आसपास अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून आरोपींनी सागर सोनवणे याला गाठले. कोणताही विचार न करता, अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरवर धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन सागर जागीच मृत्युमुखी पडला.
या घटनेची माहिती मिळताच सागरचा भाऊ विशाल सोनवणे आणि इतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला खासगी वाहनाने तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सागरला मयत घोषित केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या गंभीर प्रकरणाची फिर्याद मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी संशयित आरोपी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खूनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.









