जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या वीजतारांना कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने तालुक्यातील दोंदवाडे येथे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एकूलती शिवारात आज शनिवारी दि. २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजी गरबड पाटील (वय ५५, रा. दोंदवाडे ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी होते. त्यांच्या पत्नी सिंधुबाई पाटील यांनीदेखील दहा वर्षे ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून पद भूषविले आहे. सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे. त्यांच्या कापसाच्या शेतात कोळपणी करण्यासाठी ते शनिवारी दि. २० ला दुपारी जात होते. (केसीएन)त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या विजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारली व ते खाली कोसळले. त्यांच्या आवाजाने मजूर धावत आला, त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले.
दरम्यान त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी उपचारांती त्यांना मयत घोषित केले. पोलीस पाटील नितीन परदेशी यांच्यासह दोंदवाडे, एकूलती, पहूर येथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करीत आहेत. महावितरण कंपनीने वीजतारा सुव्यवस्थित कराव्यात तसेच मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे .