मनसेकडून मराठीचा आग्रह असावा, दादागिरी नको
जळगाव ( प्रतिनिधी ) – वक्फ बोर्डाबाबतचे विधेयक हे मुस्लिम समाज विरोधी नाही. तर विरोधक उगाचच हल्लाबोल करून दिशाभूल करत आहेत, असे प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या एकदिवसीय मेळाव्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे जळगावात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला सहकार्य केले होते. त्याचा फारसा फायदा आम्हाला झाला नाही. मात्र विधानसभेत आम्ही आमच्या बहुमतावर निवडून आलो आहोत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईला बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम सुरू आहे. बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरणे चुकीचे आहे, कारण तिथे देशभरातून लोक कामासाठी येतात.”
त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “आमच्या पक्षाला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद मिळावे, तसेच स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थान द्यावे, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटींवर टीका करत आठवले यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी वारंवार जाऊ नये. मनसेने विकासाच्या मुद्यावर बोलावे. दादागिरी करणं अयोग्य आहे.”