मुंबई (वृत्तसंस्था ) ;- देशात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचे लसीकरण १ मे पासून सुरू करण्यात आले. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे यामध्ये सातत्याने खंड पडला असलातरी आता केंद्र सरकारने जूनअखेर पासून महाराष्ट्राला लसीचे दररोज नऊ लाख डोस पुरवणार असल्याचं म्हटलंय. कोव्हीशील्ड, कोव्हाक्सिन या लसीचे उत्पादन वाढल्यानंतर व स्फुटनिक व्ही उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार हा पुरवठा करेल. याबाबतची माहिती राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जून महिन्यात 70 लाख तर जुलै महिन्यात एक कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात दररोज 2.13 लाख लसी देण्यात आल्या. हेच प्रमाण एप्रिल महिन्यामध्ये दररोज 3.25 लाख इतके होते.
केंद्र सरकारने दररोज नऊ लाख लसी देण्याची तयारी दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने देखील नागरिकांना इतक्या लसी दररोज देण्याची सज्जता असल्याचं म्हटलंय.







